टाव्हरेवाडीत ३२ एकर ऊस जळाला; तत्पर शेतकऱ्यांनी १६ एकर ऊस वाचवला
मंचर: टाव्हरेवाडी (ता. आंबेगाव) येथे सहाच्या सुमारास वीज तारांचे घर्षण होऊन सुमारे ३२ एकर ऊसाच्या क्षेत्राला आग लागली. शेतकऱ्यांच्या तत्परतेमुळे १६ एकर ऊस वाचवण्यात यश आले आहे.
टाव्हरेवाडी गावाच्या हद्दीत असणाऱ्या चिंतामणी पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीजवळ ऊसाचे मोठ्या प्रमाणावर क्षेत्र आहे. नदी असल्याने या परिसरात ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणावर होत असते. सायंकाळी सहाच्या सुमारास विजेच्या तारांवर कावळे बसल्याने तारांचे एकमेकांना घर्षण होऊन शॉर्टसर्किट झाले.
विद्युत तारांच्या घर्षणामुळे ऊसाला आग लागली. यामध्ये सुमारे ३२ एकर ऊस जाळून खाक झाला. परंतु, शेतकऱ्यांच्या तत्परतेमुळे १६ एकर ऊस वाचवण्यात यश आले आहे. या आगीत बाबाची ज्ञानेश्वर बांगर यांचा दोन एकर, रोहिदास बन्सी पोखरकर यांचा एक एकर, प्रकाश दगडू पोखरकर यांचा एक एकर, बजरंग दगडू पोखरकर यांचा दीड एकर, गबाजी विठोबा पोखरकर यांचा एक एकर, रंजना अशोक थोरात यांचा तीन एकर, बबन यांचा दीड एकर, सतू गणाजी बांगर यांचा ४ एकर ऊस जळून खाक झाला आहे.
आग आटोक्यात आणण्यासाठी बापू टाव्हरे, नितीन टाव्हरे, काळूराम शिंदे, बजरंग पोखरकर, बाबाजी बांगर, प्रकाश पोखरकर, प्रल्हाद मोरडे, अरुण टाव्हरे, सुरेश टाव्हरे, दिलीप पारधी, बाळा पारधी यांनी प्रयत्न करून इतर असणारा सोळा एकर ऊस वाचवला आहे.












