छत्रपती संभाजीराजांचे बलिदान झाले, तो स्तंभ आजही अस्तित्वात
लोणी काळभोर: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhaava Chhatrapati Sambhaji Maharaj) जीवनावर आधारित छावा (Chhaava) चित्रपटाला राष्ट्रप्रेमी प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यातील प्रत्येक प्रसंग लोकांना भावतो आहे. शेवटच्या बलिदानाच्या प्रसंगी तर प्रेक्षक ढसढसा रडत आहेत. मात्र ज्या जागेवर संभाजी महाराजांचे बलिदान झाले, ती जागा आजही अनेकांना माहीत नाही.
पूर्वीचा बहादूरगड आणि आताचा धर्मवीरगड (Dharmveer Gadh) पुण्यापासून सुमारे १०० किलोमीटर (६२ मैल) अंतरावर आहे. जवळचे शहर दौंड आहे. हा किल्ला भीमा नदीच्या उत्तरेकडील दौंड शहराच्या पूर्वेस सुमारे १५ किलोमीटर (९.३ मैल) अंतरावर पेडगाव या गावात आहे.
छत्रपती संभाजी महाराजांना (Chhaava Chhatrapati Sambhaji Maharaj) संगमेश्वरला पकडल्यानंतर औरंगजेबाने अकलूजला असलेली छावणी पेडगावला आणली. हा भुईकोट किल्ला आहे. याच किल्ल्यात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान झाले. ज्या खांबाजवळ त्यांचे हौतात्म्य झाले तो खांब आजही या किल्ल्यात पाहण्यास मिळतो.
हे देखील वाचा: शिवजयंतीनिमित्त जुन्नरमध्ये शिवनेरी मॅरेथॉन १६ फेब्रुवारी रोजी
याच ठिकाणी मराठ्यांचा छावा असलेल्या संभाजी महाराजांनी औरंगजेबासारख्या क्रूरकर्म्याला धर्मवीर काय असतो, देशनिष्ठा आणि धर्मनिष्ठा काय असते, हे दाखवून दिले. याच किल्ल्यात त्यांच्यावर तब्बल २९ दिवसपर्यंत पराकोटीचे अत्याचार करण्यात आले. मात्र मराठ्यांचा छावा तरीही खंबीर राहिला आणि त्याने कुठलेही धर्मपरिवर्तन स्वीकारण्याऐवजी हौतात्म्य स्वीकारले. आता या गडाला धर्मवीरगड म्हणून ओळखले जाते. मात्र सध्या या किल्ल्याची दुरावस्था झालेली असून येथील अनेक वास्तू मोडकळीस आलेल्या आहेत.
गडाचा इतिहास: मुघल साम्राज्याच्या काळात पेडगाव हे मुघल सैन्याचे मुख्य ठिकाण होते. १६७२ मध्ये दख्खनेतील मुघल सेनापती बहादूर खान (औरंगजेबाचा दुधभाऊ) आणि त्याचा मामा याने येथे तळ ठोकला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा सैन्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला. बहादूरखानाने या किल्ल्याचे नाव बहादूरगड असे ठेवले.
मोहिम: यानंतर त्याच्या विरुद्ध स्वराज्यात पेडगावची मोहिम आखली गेली आणि त्या मोहिमेचे प्रमुख सरदार होते स्वतंत्र स्वराज्याचे पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते. त्यांच्या सोबत अनाजीपंत, मोरोपंत पिंगळे, येसाजी कंक, म्हाळोजी घोरपडे व त्यांचा मुलगा संताजी घोरपडे, धनाजी जाधव, बहिर्जी नाईक व त्यांचा साथीदार नंदी इ. यांचा समावेश होता. या मोहिमेचा खरा उद्देश होता बहादूर खानाने लुटून आणलेले हिंदू देव-देवता त्याच्याकडून परत आणायचे.
लुटलेले पेडगाव: या मोहिमेत सरसेनापतींनी ९,००० सेनेच्या दोन तुकड्या केल्या होत्या, त्यापैकी स्वतःसोबत २,००० सेना आणि बाकीची ७,००० सेना येसाजी कंक, म्हाळोजी घोरपडे आणि मोरोपंत पिंगळे यांना दिली होती. त्यांनी पेडगाव लुटायचा बेत आखला होता. त्यामुळे बहादूरगडच्या मुख्य दरवाजावर ७,००० सेना उभी करून बहादूरखानाची सेना आली तर उलट जंगलात पळायचे अशाप्रकारे हंबीररावांची पहिली मोहिम फत्ते झाली. आत औरंगजेबाचा दुमजली महाल आहे. १७५९ मध्ये पेडगाव हे सदाशिवराव भाऊ पेशवे यांनी ताब्यात घेतले आणि ते १८१८ पर्यंत मराठ्यांकडे राहिले.












