समर्थ युवा महोत्सव २०२५: जीवनशास्त्र आणि चरित्रकला शिक्षणाचा प्रेरणादायी आविष्कार
बेल्हे: समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट येथे आयोजित “समर्थ युवा महोत्सव २०२५” नुकताच मोठ्या उत्साहात आणि भव्यतेने संपन्न झाला. या उत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध शिवव्याख्याते आणि प्रेरणादायी वक्ते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वारकरी संस्कृतीच्या छटा असलेली शोभायात्रा आणि ग्रंथदिंडी सादर केली.
वारकरी संस्कृतीचा सन्मान
शोभायात्रेत विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची भगवी पताका घेऊन टाळ आणि मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष केला. पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्माईंची पालखी फुलांनी सजवली होती. या पालखीत संत ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ, एकनाथ, नामदेव, तुकाराम या संतांच्या वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी वारकरी पायी दिंडी सादर केली. डोक्यावर तुळस, हातात टाळ आणि मृदुंग घेऊन हरीनामाचा जयघोष करत विठूमाऊलीचा गजर करण्यात आला. मान्यवरांनी पालखीचे पूजन केले आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेच्या पूजनाने युवा महोत्सवाला सुरुवात करण्यात आली.
नितीन बानगुडे यांचे प्रेरणादायी संदेश
उद्घाटन प्रसंगी प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी विद्यार्थ्यांना यशाचे मूलमंत्र सांगताना म्हटले, “यशाला शॉर्टकट नसतो. कष्टाला पर्याय नाही. यश मिळवण्यासाठी मेहनत खूप महत्त्वाची असते. समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट मध्ये माणूस घडवण्याचे शिक्षण दिले जाते. इथे जीवनशास्त्र आणि चरित्रकला शिकवली जाते.”
हे देखील वाचा: WhatsApp वर येणार अनोखं फीचर: तुमचा आवाज ऐकला की लगेच देईल उत्तर!
त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश देताना सांगितले, “जगात कोणीही तुम्हाला पराभूत करू शकत नाही, फक्त तुम्हीच तुमचा पराभव करू शकता. त्याचप्रमाणे जगात कोणीही तुम्हाला विजयी बनवू शकत नाही, तुम्हीच तुमचा विजय मिळवू शकता. तुमच्या मनापेक्षा दुसरे सामर्थ्यशाली काहीच नाही.”
त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेम करण्याचा सल्ला देताना म्हटले, “प्रेम करायचं झालं तर स्वतःच्या ध्येयावर करा, म्हणजे दुनिया तुमच्यावर प्रेम करायला लागेल. भावनांची व्यर्थ गुंतवणूक करू नका. अशक्य असं काहीच नाही, फक्त विश्वास असायला हवा.”
उपस्थित मान्यवर
या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, सर्व विभागांचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर यांनी केले तर आभार संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी मानला.
“समर्थ युवा महोत्सव २०२५” हा केवळ एक उत्सव नसून तर चैतन्याचा, प्रेरणेचा, संस्कारांचा आणि विचारांचा आविष्कार होता. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्याचे मार्गदर्शन मिळाले आणि त्यांच्या मनातील संशय दूर करण्यात मदत झाली.












